Monday, July 26, 2010

गुरूमुखी...गुरूसुनी


गुरुपौर्णिमा.हिंदुस्थानी संगीतक्षेत्रातला हा एक अविभाज्य उत्सव. संगीताच्याही क्षेत्रातलं गुरु-शिष्य नातं बदलत गेलं, तरीही त्याची पाळंमुळं खोल आहेत. ‘अखेर आत्मभान हाच तुमचा गुरू’ असं मानणा-या ऱ्या आरती अंकलीकर- टिकेकर यांनी, या मुळांचा वेध घेतानाच गुरु-शिष्य नात्याच्या ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह’ स्वरूपाचे उलगडून दाखवलेले पैलू..

हुसेन जब के चले, बादे दो पहरन को
कोई न था के जो थामे, रकाने तौसन को
सकीना रोती थी थामे कबाके दामन में
हुसेन चुप के खडे थे झुकाये गर्दन को..
‘सरदारी बेगम’मधला एक प्रसंग आहे. तरुण सरदारी गाणं शिकण्यासाठी कोठीवर जाते, तेव्हा तिच्या आवाजाचा पोत कळण्यासाठी कोठेवाली तिला गाणं म्हणायला सांगते. सरदारीला गाणं येत नसतं. मग ती मोहरमला म्हटला जाणारा मीर अनीस यांचा हा मरसिया (शोकगीत) एकाच संथ सुरात म्हणून दाखवते. साथीला कुठलं वाद्य नसतं की, मरसियाला कुठली चाल. पण तो मरसिया कोठेवालीच्या अंत:करणाला स्पर्श करून जातो. ती सरदारीला गाणं शिकवायला तयार होते.
म्हणजे कोठेवालीला सरदारीच्या आवाजातला दर्द भावतो?
तिला सरदारीच्या आवाजातला सच्चा सूर घायाळ करतो?
की मरसियातील शब्द तिची दुखरी नस पकडतात?
गाणं किंवा कुठल्याही कलेतलं रसिकाला नेमकं काय भावतं? त्या कलेची ताकद कशात असते? किंबहुना त्या कलेचं ‘कला’ पण कशात असतं, कलेच्या रचनेत, कलेच्या मांडणीत की कलेच्या सौष्ठवात?
‘सरदारी बेगम’मध्ये वरील कलमा किंवा मरसिया गाणा-या लोकप्रिय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर म्हणतात,‘‘कुठल्याही कलेचं ‘कला’पण, रसिकाला मूर्तरूपाकडून अमूर्तरूपाकडे नेण्याच्या क्षमतेत आहे. कुठल्याही कलेचं मूर्तरूप हे स्थूलरूपच असतं. म्हणजे साहित्यात शब्द असतील, चित्रकलेत आकार काढले जात असतील, किंवा विशिष्ट चालीत-सुरात गाणं बांधलेलं असेल, तर हे सारं म्हणजे त्या-त्या कलेचं स्थूलरूप झालं. पण कलेच्या या स्थूलरूपाला सूक्ष्मरूपात नेऊन ती कला अमूर्त पातळीवर नेण्याची ताकद त्या कलेत असते. मात्र कलेला मूर्ताकडून अमूर्ताकडे नेण्याचं शिवधनुष्य कलावंताला पेललं पाहिजे. ते ज्यावेळी पेलवतं, तिथे साहित्याचा फॉर्म-घाट, चित्रकलेतले आकार आणि गाण्यातले शब्द आणि संगीत सारं झूठ ठरतं. सरदारीने पढलेल्या कलामात ती ताकद होती. श्रोत्याला दृश्याकडून अदृश्याकडे नेण्याची.’’
साहित्य किंवा सौंदर्यशास्त्रानुसार एखाद्या कलासंज्ञेची व्याख्या करावी आणि तिचं रूपही अलगद उलगडमून दाखवावं, त्याप्रमाणे आरती अंकलीकर कलामीमांसा करत होत्या. कलेचं ‘कला’पण कशात असतं, ते स्पष्ट करत होत्या. पण याचं श्रेय मात्र स्वत:कडे घेण्याऐवजी, ते आपल्या गुरूलाच देत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या आज ज्या काही गातात, किंवा गायनाच्या अनुषंगाने जे विचार मांडतात, त्याची पायाभरणी त्यांच्या गुरूंनीच केली आहे.
आरती अंकलीकर यांना अत्यंत तोलामोलाचे असे चार गुरू लाभले. पं. वसंतराव कुलकर्णी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. उल्हास कशाळकर आणि पं. दिनकर कैकिणी. वेगवेगळ्या प्रकृतीच्या या चार गुरूंनी आपल्याला समृद्ध केलं असं सांगून आरती अंकलीकर म्हणतात,‘‘वसंतरावांकडे मी बारा वर्ष गाणं शिकले. ते माझे पहिले गुरू. ते हाडाचे शिक्षक होते, पण गवई नव्हते. त्यांनी माझं गाणं पक्क करून घेतलं. माझ्या गाण्याचा पाया त्यांनीच तयार केला. पण गायक कलावंत म्हणून जी दृष्टी यावी लागते, ती मला उरलेल्या तिघांनी दिली. वर्षानुवर्ष केलेल्या तालमीतही जे शिकायला मिळत नाही, ते एखाद्या स्टेज परफॉर्मन्समधून शिकायला मिळतं. तुम्ही यमन सादर करताय. तो सादर करताना यमनची जी बलस्थानं आहेत आणि तुमचीही बलस्थानं आहेत, ती अशा पद्धतीने पेश करताय की, समोरचा रसिकवर्ग यमनमध्ये विरघळून गेलाय. हे समर्थपणे तुम्ही जेव्हा वारंवार पेश करता, तेव्हाही तुम्ही घडत असता. हा जो मंचावर कलावंताने घडण्याचा प्रवास आहे, तो किशोरीताई, उल्हासजी आणि कैकिणीमास्तरांकडून मी शिकले. त्यांची अनुभवसिद्धता मला मिळाली. शिक्षक शिकवतात ते शास्त्र असतं. वसंतरावांनी मला केवळ शास्त्र शिकवलं, असं मला म्हणायचं नाही. परंतु गुरू जेव्हा एखादी चीज समर्थपणे कशी म्हणायची, हे दाखवतो आणि तेव्हा श्रोता म्हणून तुमच्यावर जो असर होतो, तो महत्त्वाचा असतो. म्हणजे संगीतातली एखादी जागा - ग म ध नी ध प .. तर ती संगीत शिक्षक नुस्त्या शब्दांनी सांगतो, पण गायककलावंत तेच केवळ स्वरांनी गाऊन दाखवतो. ही जी शब्दांशिवाय केवळ स्वरांतून अमूर्त असं काही साकार करायची विद्या आहे, ती गाणा-या कलावंताकडूनच मिळू शकते.
किशोरीताईंकडून तर मी फॉर्मच्या पलीकडचं शिकले. त्यांचं गाणं संगीताच्या सगळ्या फॉर्म्सना उल्लंघून कधीच पुढे गेलंय. म्हणजे फॉर्म गात असतानाही त्या फॉर्मच्या बंधनातून मुक्त असतात. त्यांच्यासारखा रागाचा, फॉर्मचा विचार अन्य कुणी केलेला नाही. उल्हासदादांचं आणखी वेगळं.. त्यांचं आग्रा-ग्वाल्हेर घराण्याचं गाणं. त्यांची तालीम म्हणजे बुद्धिमान गवयाची तालीम. त्यांनी आपल्या गुरूकडून मिळालेला विचार अजून विकसित केला. कैकिणीमास्तरही सर्जनशील कलावंत. त्यांनी नवे राग बांधले. बंदिशी रचल्या. ब्रज, हिंदी, अवधी भाषा, त्यातले शब्द, शब्दोच्चार, कुठल्या भाषेत कुठला शब्द, कुठलं व्यंजन वापरायचं, याचा त्यांनी अगदी बारकाईने विचार केलेला आहे. हे सारं या गुरूंकडून शिकतच आजची आरती अंकलीकर घडली आहे.’’
आरती अंकलीकर यांचं गाणं ऐकताना याचा प्रत्यय येतोच. मग ते शास्त्रीय असो उपशास्त्रीय असो वा भावगीत.. समोर बसलेला रसिक ज्या कलाजाणिवेचा त्या जाणिवेचं गाणं त्या रसिकाला हमखास ऐकवतात. म्हणूनच त्यांचं ‘उगवली शुक्राची चांदणी’ ही लावणी रसिकांच्या पसंतीस उतरते. त्यांनी गायलेली ‘राह में बिछी पलके आओ’ ही सरदारीतली ठुमरी रसिकांचा कलिजा खलास करते. ‘मी राधिका, मी प्रेमिका’ हे भावगीत मंत्रमुग्ध करतं. तर यमन रागात त्यांनी गायलेली एखादी चीजही मूळ रागातील अवकाशाचं दर्शन घडवण्यात सफल होते. तरीही आपल्याला गुरुकुल पद्धतीने संगीताचं शिक्षण मिळालं नाही, याची खंत त्यांना आहेच. कारण गुरू केवळ गाणं देत नाही, जगण्याचं भान देतो असं त्या सांगतात. त्यासाठीच संगीत शिक्षणासाठी गुरुकुल पद्धतीच योग्य असल्याचं सांगताना त्या म्हणतात,‘‘शास्त्रीय संगीतासाठी गुरूकुल पद्धती एकदम परफेक्ट आहे. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे रोज गुरूकडे जाणं शक्य व्हायचं नाही. परिणामी गुरूकडेच राहायचं, हीच पद्धत होती आणि ती गुरू व शिष्य दोघांसाठीही सोयीची होती. तिथे गुरूच्या केवळ गाण्यालाच नाही, त्याच्या जीवनशैलीला शरण जाणं व्हायचं. अर्थात गुरुची जीवनशैली आदर्श असायला हवी. कारण प्रत्येक गुरूची जीवनशैली आदर्श असायची किंवा आजही असतेच असं मला वाटत नाही. त्यात पुन्हा आदर्श काय हाही वादाचाच मुद्दा आहे. परंतु महत्त्वाचं हे की, 24 तास गुरू कलाकार म्हणून कसा आहे, ते शिष्याला पाहायला-शिकायला मिळायचं. त्याची साधना, चिंतनच काय पण आहार, त्याची रहन-सहन, साऱ्याचं अवलोकन करता यायचं. चांगला गायक म्हणून घडण्यासाठी हे सारं आवश्यक असतं.
मात्र पूर्वीच्या काळी शिष्याला गुरूच्या घरी राहून त्याची सर्व सेवा करावी लागायची, यामागे एक सामाजिक बांधणी होती. तेव्हाची गुरू-शिष्याची देवाणघेवाण ही बार्टर सिस्टीमप्रमाणे होती. सर्वच शिष्यांना गुरूला दक्षिणा द्यायला जमायची नाही. त्याबदल्यात तो गुरूची सेवा करायचा. त्याही पेक्षा जसं घरात वागणार, तसंच गुरूकडे वागायचं, ही पद्धत होती. त्यामुळेच शिष्याला गुरूचे कपडे धुवावे लागले, किंवा त्याला गुरूची पिकदानी साफ करायला लागली, तरी त्याला त्याचं काही वाटायचं नाही. किंबहुना गुरूची कोणत्याही प्रकारची सेवा करयाला मिळणं हा शिष्याला तेव्हाच नव्हे, आजही सन्न्मानच वाटतो.’’

मुख्य म्हणजे गायन ही ‘गुरुमुखी’ आणि ‘गुरुसुनी’ कला असल्याचं आरतीताई सांगतात आणि त्याचं महत्त्वही पटवून देतात,‘‘आता मुलं आठवडय़ातून दोन दिवस शिकतात आणि पाच दिवस घरीच रियाझ करतात. तो रियाझ अनेकदा चुकीचा होऊ शकतो. गुरू शिकवतो एक आणि शिष्य घरी जाऊन गातो भलतंच, असं होण्याची शक्यता असते. म्हणजे तो चुकीच्या पद्धतीने आवाज लावू शकतो, चुकीच्या पट्टीत गाऊ शकतो आणि असं खूप काळ झालं, तर त्याला त्रास होऊ शकतो. गळा बिघडू शकतो. अगदी मेन्टल ब्लॉक्सही येतात. त्यामुळे शिष्य योग्य पद्धतीने गातोय की नाही, ते ऐकण्यासाठीही गुरू जवळ असणं आवशयक असतं. महत्त्वाचं म्हणजे संगीतविद्या ‘गुरुसुनी’देखील असली पाहिजे. गुरूने शिष्याची विद्या ऐकायला पाहिजे. म्हणजे गुरुच्या मुखातून शिष्य ही विद्या घेतो, ती पचवतो आणि तीच परत इतरांना ऐकवतो; अशावेळी शिष्याने आपलं गाणं कसं पचवलंय, पेललंय हे गुरूने नीट ऐकलं पाहिजे. गुरू शिष्याचं गाणं ऐकतो, तेव्हाच सर्कल पूर्ण होतं.’’
आज आरती अंकलीकरांचं गाणं ऐकताना ते परिपूर्ण वाटतं. चार गुरुंकडे शिकल्या असल्या, तरी त्यांचं गाणं हे त्यांचं ‘स्वत:चं’ वाटतं. डोळे उघडे वा मिटलेले असले, तरी समोर आरती अंकलीकर गातायत असंच वाटतं. किशोरी आमोणकर गातायत असं वाटत नाही किंवा उल्हास कशाळकरांची वैशिष्टय़ंही त्यांच्या गाण्यात डोकावत नाहीत. असं असलं तरी कारकीर्दीच्या सुरुवातीला गुरूला फॉलो करणंच सोयीचं असतं, असं सांगून त्या म्हणतात,‘‘संगीतशैली म्हणजे दुसरं काही नसून ती विचार करायची पद्धत आहे. खयाल किंवा रागसंगीत असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा तो एक संपूर्ण विचार असतो. म्हणजे मी एक तास भूप राग मांडते, तेव्हा मी तो पाठ केलेला नसतो. तर मी त्या रागाच्या स्वरांकडे कशी पाहाते, त्यासंबंधीचे माझे विचारच मांडत असते. परंतु माझा विचार स्वतंत्रपणे विकसित होण्याआधी मी गुरूने दाखविलेल्या मार्गावरूनच चालत असते. अगदी गुरू आवाज कसा लावतो इथपासून ते बंदिशीचे शब्द कसे बांधायचे, आलाप कसे घ्यायचे, आलापातील बोल कसे म्हणायचे, ताना मारताना वेगवेगळे पॅटर्नस् कसे वापरायचे, तालाचा-लयीचा विचार.. हा जो रागाचा सर्वागीण विचार आहे, तो गुरूकडे गुरुकुल पद्धतीनेच मिळतो. आपली बुद्धी परिपक्व होत नाही, आपला विवेक जागृत होत नाही. आपल्या गळ्याला-बुद्धीला काय पेलवेल, ते कळत नाही. आपलं बलस्थान नि वीकनेस काय हा विचार करण्याची क्षमता येत नाही. तोपर्यंत एका समर्थ गुरूची शैली फॉलो करणं हा एक सेफ प्ले आहे. आणि त्यासाठी गुरुकुल पद्धती आयडियल आहे.’’
मुळात आरती अंकलीकर गुरूकडे केवळ अंधदृष्टीने पाहात नाहीत. त्यामुळेच गुरूचं अंधानुकरण करणं, त्यांना मान्य नाही. गुरुकुल पद्धतीचं कितीही समर्थन केलं, तरी कायम गुरूच्या प्रभावातच अडकून पडण्याला आरती अंकलीकरांचा साफ विरोध आहे. कारण कलावंताला जर आपण सर्जनशील मानत असू, तर त्याने गुरूने दिलेली कला जशीच्या तशीच सादर करण्याला सर्जनशील कसं म्हणता येईल? असा त्यांचा प्रश्न आहे. मग या सर्जनशीलतेला नवनिर्मिती न म्हणता पुनर्निर्मितीच म्हणावं लागेल, असं त्या म्हणतात आणि म्हणूनच वेळ येताच शिष्याने गुरूच्या प्रभावातून बाहेर पडलं पाहिजे, असंही त्या आवर्जून सांगतात.
संगीत वा कुठलंही शिक्षण कधीच संपत नाही. ती प्रक्रिया अव्याहत सुरूच राहणारी आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर शिष्य किंवा विद्यार्थीच नाही, प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. पण आरती अंकलीकर या शिक्षणप्रक्रियेला एक वेगळंच परिमाण देतात. त्या म्हणतात,‘‘जेव्हा आपण शिकत असतो, तेव्हा आपण विद्यार्थी नसतोच. जेव्हा शिक्षण म्हणजे काय कळतं, तेव्हा आपण खरे विद्यार्थी होतो आणि मग त्यानंतर आपलं शिक्षण थांबतच नाही. प्रत्येक क्षण आपल्याला शिकवत राहतो. मग तुम्हाला प्रत्यक्ष गुरुचीही गरज उरत नाही. तुम्हाला तेव्हा आत्मभान आलेलं असतं. हे आत्मभान हाच मग तुमचा गुरू होतो.’’ आरती अंकलीकर यांचं गाणं ऐकताना या आत्मभानाचंच दर्शन घडतं.

Marathi Online News

No comments:

Post a Comment